कोल्हापूर : ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वर्गातील परिपाठाबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन, ज्ञान संपादन करावे. समृध्द ग्रंथालये विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी वाढविण्यासाठी सहायकारक ठरतात व विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात,’ असे विचार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३०व्या स्मृतीदिनानिमित्त ‘स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’च्या विवेकानंद महाविद्यालयातील ग्रंथालयात आठ ऑगस्ट रोजी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्राचार्य साळुंखे बोलत होते. शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर आधारित पुस्तके या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीला साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. नीता पाटील यांनी केले तर आभार हितेंद्र साळुंखे यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून ग्रंथप्रदर्शनाचे संयोजन केले होते.
कार्यक्रमाला प्रा. किरण पाटील, प्रा. बी. के. गोसावी, प्रशासकीय सेवक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.